गेल्या काही वर्षापासून पत्रकारीतेत आहे.
दररोज वेगवेगळ्या बातम्या, चर्चा, वाद-विवाद आणि बरच काही. या सगळ्यातून स्वतःची तयार झालेली काही मतं. काही ऑन द रेकॉर्ड तर काही ऑफ द रेकॉर्ड. पडद्यावर काही अन् पडद्यामागेही. बातम्या सगळ्या प्रकारच्या. राजकीय, सामाजिक समस्या, आर्थिक, खेळांच्या, शहराच्या, गावच्या, शेतीच्या, गल्लीतल्या, दिल्लीतल्या आणखीही खूप... बातम्यांनुसार कधी राग, कधी आपुलकी, कधी स्पर्धा, कधी दुःख, कधी संताप, कधी निराशा, कधी प्रश्न तरी कधी चुकुन उत्तरंही... कधी चर्चा, कधी भांडण, कधी समजून घेणं, कधी उमजणं, कधी संवाद तर कधी सुसंवाद...
हे सगळं बातम्यांच्याच विश्वातलं.. पण आपण राहतो त्या घरात, समाजात, मित्रांमध्ये इतरत्र असंही काही घडत असतं, ज्याकडे आपलं कधी लक्ष असतं, कधी नसतं. काहींचा आपल्यावर परिणाम होतो, तर काहींचा अजिबात नाही. काही घटनांनी 'आपल्यातला माणूस' जागा होतो, तर काही वेळा तो हताश होतो. आपल्याला काही प्रश्न सतावतात, काहींची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करतो, तर काहींच्या फंदातच पडत नाही. काही वेळा प्रश्नांची उत्तरं, तर काही वेळा प्रश्नातून प्रश्न...
या ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या मनातले काही विचार मांडणार आहे. मी मांडेन ते योग्य असेलच असं नाही. तुम्हाला पटेलही किंवा पटणार नाही. प्रश्न उपस्थित करेन, विचार मांडेन, आवाहन करेन. जे चांगलं असेल ते तुमचं, नसेल ते माझं.
समाजात सध्या फार काही भल सुरु नाही असं सगळे जणं म्हणतात. जे चांगलं नाही त्याबद्दल माझे विचार माडेनही पण जे काही चांगलं दिसेल ते मांडण्याचा नक्की प्रयत्न करेन. नेहमीप्रमाणे तुमच्या शुभेच्छा, मार्गदर्शन हव्यातच. तेंव्हा, शुभम् भवतु.... !
